भिवंडी : फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासंदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे भिवंडीतील शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये प्रबोधन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ठाणे जिल्हा प्रधान सचिव गणेश शेलार यांनी भिवंडीतील रांजणोली, शिवनगर, चौधरपाडा, सावाद, मुठवल, सरवली या जिल्हा परिषद शाळांमध्ये, तसेच लोनाड येथील शिव खंडेश्वरी विद्यामंदिर आणि लोनाड-चौधरपाडा पंचक्रोशी हायस्कूल या माध्यमिक शाळांमध्ये फटाकेमुक्त दिवाळी अभियान राबविले.
फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण व वायूप्रदूषण होते. कार्बन मोनॉक्साइड, सल्फर, नायट्रोजन डायऑक्साइड यांसारख्या विषारी वायूंचे उत्सर्जन होते. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. फटाके वाजवताना अनेक मुले भाजतात. काही ठिकाणी आगी लागून जिवघेणे अपघात होतात. त्यामुळे फटाके न वाजवता त्याऐवजी वाचलेल्या पैशातून आवडीची पुस्तके विकत घेणे, शैक्षणिक खेळणी, किल्ले बनविणे, यांसारख्या गोष्टी करता येऊ शकतात आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करता येते, असे प्रबोधन करण्यात आले.
अशा प्रबोधनाची गरज असल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले. या वेळी सीमा गायकवाड, एस. बी. चव्हाण, शोभा भोईर हे मुख्याध्यापक, स्मिता कदम, मोहिनी खैरनार, सोनाली शिंपी, ज्योती पाटील आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.